Page 8 of 8

Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story

Posted: 21 Jun 2020 15:56
by admin
वलय - प्रकरण १७

सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, "मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा."

"अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!"

"आई! मी येतांना तुला फोन करीन मग तू ये तिथे. मला आज धर्मापूरला जाणे जरुरीचे आहे!!"

"जा बाबा जा! मी सांगितले तरी तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे ते माहित आहे मला! पण संध्याकाळी लवकर ये! उद्या गोडंबे काका आणि त्यांची सुनंदा येणार आहेत आपल्याकडे! तू येणार आहेस म्हणून बोलावून घेतले मुद्दाम त्यांना! तुला आधीच सांगितले असते तर तू मुंबईहून आलाच नसतास इकडे! टाळाटाळ केली असतीस!"

"अगं आई, हे काय चालवलंयस तू? मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले होते की मी लग्न करणार नाही आहे. सुनंदाशी तर नाहीच!"

"आता बास झालं राजेश! एक शब्द बोलू नको! आतापर्यंत ऐकत आले तुझं पण आता मी तुझं ऐकणार नाही! मी गोडंबे काकांना शब्द दिलाय. तुझं लग्न होईल तर त्या सुनंदाशीच!"

"आई मला थालीपीठ खाऊ दे!"

"अरे आरामात खा! अजून दोन थालीपीठ घे आणि पोटभर खा! पण, खाल्ल्यावर मी तुला पुन्हा हेच सांगणार आहे की सुनंदा आपली सून होईल! इतर काही ऐकू नकोस पण हे मात्र माझे तुला ऐकावेच लागेल!"

"अगं आई, मला तुलाही घेऊन कायमचा मुंबईत जायचा विचार आहे. ती आणि तिचे कुटुंब खूप खेडवळ आहेत! त्यांना माझी ही अशा प्रकारची नोकरी आवडणार नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल गावाकडे बरेच समज गौरसमज आहेत! आणि मी जरी तिला लहानपणापसून बघितले आहे तरीही तीच्याकडे मी त्या भावनेने बघितले नाही!"

"मला बहाणे नकोत! त्या भावनेने बघितले नाहीस ना? मग लग्न झाल्यावर बघ त्या भावनेने! तुला माहीत आहे ना आपण वचन दिलंय त्यांना?"

"वचन बिचन या सगळ्या लहानपणच्या गोष्टी आहेत! आम्ही मोठे झालो आता. विसरा ती वचनं!!"

"अरे त्या गोष्टी लहानपणाच्या असल्या म्हणून काय झालं? काळानुसार वचन हे वचनच राहते! आणि गोडंबे काकांनी आपल्याला किती मदत केली आहे माहित आहे ना तुला? त्याची परतफेड नको करायला?"

"अगं आई वेळोवेळी तू आणि मी पण त्यांच्या मदतीला धावून गेलोच आहोत की!" राजेशने आठवण करून दिली.

"हे वचन तुझ्या बाबांनी दिलं आहे हे ठावूक असूनही तू असा का वागतोस राजेश?" आई अर्धे रडून आणि अर्धे संतापून पदराने डोळे पुसत बोलली.

"थालीपीठ हळूहळू बेचव का होते आहे बरं? दही पण जरा जास्तच आंबट आहे! " उपरोधाने राजेश म्हणाला.

"हो का? सुनंदा थालीपीठ बनवेल तेव्हा चव परत येईल हळूहळू! काळजी करू नकोस हं बाळा!" आईसुद्धा दुप्पट उपरोधाने म्हणाली.

काही केल्या आई आणि तिची सुनंदा पाठ सोडणार नव्हती त्यामुळे शांततेने थालीपीठ पूर्ण खून संपवल्यानंतर मनातला चढणारा संताप दाबून टाकत राजेश शक्य तितक्या हळू ताटावरून उठला. हो किंवा नाही न म्हणता मौन राहून तो कपडे घालू लागला.

कधी कधी कुणी हो म्हणायचे असले तरी मौन बाळगतात आणि कुणी नाही म्हणायचे असले तर मौन पत्करतात. कुणाकुणाला हो किंवा नाही यापैकी काहीच म्हणायचे नसते तेव्हा मौन राहतात. पण समोरचा त्या मौनाचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ घेतो. राजेशच्या आईनेही त्याच्या मौनाचा होकारार्थी अर्थच गृहीत धरला, भले त्याने आताच स्पष्ट संवादातून स्पष्ट नकार पोहोचवला का असेना!

एकदाचा पाठीवर सॅक घेऊन तो राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये बसला. बसमध्ये तुरळक गर्दी होती....

त्याने खिडकीजवळची जागा पकडली. कंडक्टर कडून तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघू लागला. गाडी सुरु झाली. खिडकीतून गार वारा येत होता.

आईच्या सकाळच्या लग्नासंदर्भातील चर्चेचे त्याच्या मनात विचार आले येऊ लागले.

"मी माझ्या लिहिलेल्या कथांमध्ये माझ्या मनाप्रमाणे सभोवतालाचे जग आणि पात्रे तयार करतो आणि ती सगळी पात्रे माझ्या हुकुमानुसार जगतात आणि मरतातसुद्धा! पण, खऱ्या जगातील एक पात्र म्हणजे मी मात्र पूर्ण माझ्या अधीन नाही. मला लग्नासारखा निर्णय आईच्या मर्जीनुसार आणि हुकुमानुसार घ्यावा लागतोय! पण ती सुद्धा कुणाच्या तरी खेळातले एक पात्र आहे? जगाला नियंत्रित करणाऱ्या कुणीतरी शक्तीच्या हातातले ती आणि मी सुद्धा पात्रच आहोत. पण त्याला इलाज नाही. लहानपणी दिल्या गेलेल्या काही वचनांमुळे आणि दिलेल्या शब्दांमुळे, कुणाच्या उपकाराच्या ओझ्यामुळे आणि कर्जामुळे आपण कधीकधी परावलंबी होतो."

खिडकीतून चांगला वारा येत होता. झोप येण्यासारखा हा वारा होता पण मनातील विचार त्याला झोपू देत नव्हते....

राजेशचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले, "पण मला एक समजत नाही की एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो तर खरं, पण त्यामागे त्याची भविष्यातली दूरदृष्टी असू शकते, पण आपल्याला हे आधी त्याची मदत स्वीकारतांना कळत नाही. कसे कळेल? कुणाचे मन थोडेच वाचता येते? काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणी आजकाल मदत करतच नाही का? मदतीच्या उपकारापायी परतफेडीची कुठेतरी अपेक्षा असतेच असते! असायला हवी की नको? ते ठरवणारा मी तरी कोण? आणि त्यातल्या त्यात मी आणि माझे कुटुंब मदत ‘घेणारे’ आहोत त्यामुळे ‘देणाऱ्याने’ अपेक्षा ठेवाव्यात की नको आणि काय ठेवाव्यात हे मी कसे ठरवू शकेन?"

सहजपणे राजेशची नजर बाजूला गेली तेव्हा त्याला दिसले की बाजूच्या सीटवर एकजण "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे रा. म. मालवणकर यांचे पुस्तक वाचत होता.

त्यानेही ते वाचले होते. पुस्तक बघितल्याने आणी त्यातील काही प्रसंग त्याला वाचल्याचे आठवल्याने त्याचे लग्नाच्या विषयाकडून ध्यान हटले आणि मन भूतकाळात गेले. रात्री आठवलेल्या प्रसंगांच्या पुढचे त्याला आठवू लागले.

Re: वलय (कादंबरी) Marathi latest 2020 sex story

Posted: 21 Jun 2020 15:56
by admin
वलय - प्रकरण १८

विनितने युद्धपातळीवर त्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा फडशा पाडला. इकडे तिकडे वर्तमानपत्रात तपासले. नवीन प्रकाशित झालेल्या कादंबऱ्याचा आढावा घेतला. तोपर्यंत राजेश कथा लिहिण्यात गुंतला. रात्रंदिवस मेहनत करून त्याने त्याची कथा पुन्हा लिहून काढली.

स्वत:च्याच कथेचे जसेच्या तसे प्रसंग, वाक्य आणि शब्द जरी त्याला आठवले नसले तरी शेवटी कथा त्याने लिहून काढली. विनीतला जमेल तेवढे त्याने संशोधन केले. इतर मित्रानाही त्याने मदतीला घेतले. कुठेच त्याच्या कथेसारखी कथा छापून आलेली नव्हती.

मग आता त्याने पुन्हा नव्याने लिहिलेली ही कथा छापायला द्यायची का?
याचे एखादे पुस्तकच छापायचे का?
कुणी प्रकाशक तयार होईल का?
की स्वत:च प्रकाशित करायची ती कथा?
पुस्तक स्वत: प्रकाशित करण्याइतके भांडवल नव्हते राजेशजवळ!
पुन्हा काही चौर्यकर्म घडले तर?
आणि आता परिक्षा जवळ आल्या आहेत, तेव्हा कथेचे काय करायचे ते नंतर पाहू!
असे म्हणून ती कथा त्याने नंतर कोणालाच आणि कुठेच पाठवली नाही!!

परिक्षा संपल्यानंतर कुणा प्रकाशकाला भेटून बघूया असा त्याने विचार केला.

मग परीक्षा आली.

कथा असलेली लाल रंगाची फाईल त्याने कपाटात ठेवून दिली....

कालांतराने तो हळूहळू त्या विचारांतून बाहेर पडला. अभ्यासाला लागला.

परीक्षा झाली!!

अनेक महिने उलटले...

अधून मधून राजेश वर्तमानपत्रात लिखाण करत होता. लेख लिहित होता. वाचकांचे प्रतसाद येत होते.

त्याचे बहुदा सगळे लेखन संवादात्मक असायचे. एखाद्या विषयावर भाष्य करतांना सरळ लेख न लिहिता तो दोन तीन जण त्या विषयावर चर्चा करा आहेत असे संवाद लिहायचा. एकजण त्या विषयाच्या बाजूने तर दुसरा विरोधात वगैरे असे त्याचे लिखाण लोकाना आवडून जायचे. आता लिखाण पाठवताना योग्य ती खबरदारी तो घेत होता. झेरॉक्स काढून ठेवत होता!!!

या कालावधीत एक गोष्ट चांगली झाली होती की त्याची कथा कोणत्याही दिवाळी अंकात छापून आली नाही आणि ती इतर कुठेसुद्धा पुस्तकरूपाने किंवा इतर कसल्याही प्रकारे छापून आल्याचे त्याला समजले नव्हते.

अधून मधून त्याच्या आईचा सुनंदाबद्दलचा रेटा सुरूच होता.

त्याला कसेतरी हो नाही म्हणत तो तोंड देतच होता.

आई सुनंदाच्या नावाचे अनेक फुल टॉस बॉल टाकायची आणि दर वेळेस तो सुनंदाचा चेंडू सिक्स मारून सीमापार करायचा आणि आई आणखी दुसरा चेंडू लगेच तयार ठेवायची.

दरम्यान वेळ मिळेल तसे राजेशचे वाचन आणि लिखाण सुरूच होते...

जुन्या काळातले राजे आणि राजांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पुस्तकांचा तो अभ्यास करायचा. चाणक्यबद्दल अनेक पुस्तके त्याने वाचून काढली. त्या कपाटातील त्याने पुन्हा लिहून काढलेल्या कादंबरीबद्दल का कोण जाणे त्याच्या मनात एक उदासीनता निर्माण झाली. कदाचित त्याला त्याद्वारे स्वत:च्या असहायतेची आणि विश्वासघात झाल्याची सतत आठवण होत असावी. त्याने ती कथा पुन्हा बाहेर काढली नाही.

***

एका वर्षांनंतर -

फायनल ईयरला नव्वदच्या वर मार्क पडून तो पास झाला.

तोपर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आले होते.

कॉलेज संपले होते. सुट्ट्या लागल्या!!

विनीत आणि त्याचे दोन मित्र राजेशकडे आले. तालुक्याच्या गावाला एका मित्राची मोठी गाडी घेऊन जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांचे जायचे ठरले. दोन तीन दिवस मुक्काम करून मजा करायची, फिरायचे असे त्यांनी ठरवले. सगळयांच्या परीक्षा संपल्या होत्या त्यामुळे आनंदाचे भरते ओसंडून वाहात होते. ते अगदी सक्काळीच म्हणजे पाच वाजता निघाले. सगळी तयारी आणि समान बरोबर घेतला होता.

चार मित्र आणि फिरायला एक गाडी - अजून काय पाहिजे? अगदी स्वर्गीय सुख! नाही का?

दुपारी बाराला ते अलकापूर या तालुक्याच्या गावी पोहोचले.

तेथून चार तासांचा रस्ता होता – "सावरीमाळ" या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा!

त्यांनी ब्रेक घेतला आणि एका खाणावळीत ते जेवणासाठी गेले.

विनीत, राजेश, बंडू आणि सोमा असे ते चौघं चार वेगवेगळे पदार्थ मागवून त्यावर ताव मारत होते - झुणका भाकर त्या हॉटेलची खासियत होती. त्यासोबत मिरचीचा कोल्हापूरी झटका, वांग्याचं भरीत, पनीर मटर आणि तवा पुलाव!

बंडू म्हणाला, "अरे यार विनीत, एक आयडीया आहे. ‘मंडोला सिनेमा’ मध्ये ‘किस्मत का खेल’ पिक्चर लागलाय! जाउया का? त्यात दोन सुपरस्टार एकत्र आलेत! - रोहन कुमार आणि अमित श्रीवास्तव. अमितजींनी यात वडिलांची भूमिका केली आहे! आणि रोहन कुमार मुलगा आहे."

सगळ्यांना आयडीया पसंत पडली. अजून त्यावेळेस दूरदर्शन हे एकमेव लोकप्रिय टीव्ही चॅनेल होते. अजून एक प्रायव्हेट चॅनेल होते पण दिवसातून चार तासच त्याचे प्रक्षेपण होते. व्हीसीआरचे सुद्धा प्रस्थ बरेच होते आणि इंटरनेटची अजून सुरुवात होती. पण तरीही मनोरंजनासाठी थिएटर मध्ये जाऊनच लोक सिनेमा बघत.

Page 6 complete